Friday, 29 September 2017

विजयादशमी

विजयादशमी

                नवरात्र संपत आले की चाहूल लागते ती पुढे येणाऱ्या सणासुदीच्या मोसमाची..पावसाळा जवळ जवळ संपत आला आहे आणि त्याचबरोबर शेतीचा हंगाम देखील पूर्ण होत आला आहे. त्यामुळे आता पुढच्या मोठ्या सणासाठी आपण सगळेच सज्ज होत आहोत..अशावेळी पुढे येणाऱ्या चैतन्यपूर्ण उत्सवाची सुरुवात करून देण्यासाठी म्हणून जो महत्वाचा व आनंददायी दिवस येतो, तो म्हणजे अश्विन शुद्ध दशमी अर्थातच दसरा किंवा दशहरा !  
                 आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो पण सर्वांत विलक्षण बाब अशी आहे  की, दसरा हा एकमेव सण आहे की जो रामायण आणि महाभारत या दोन्ही काव्यातील महत्वाच्या घटनांसोबत गुंफला गेला आहे. आजच्या दिवशी श्री रामचंद्रांनी घनघोर युद्ध करून रावणाचा वध केला आणि अशाप्रकारे वानरसेनेचा विजय झाला. याचबरोबर दसऱ्याच्याच दिवशी पांडवांचा एक वर्षाचा अज्ञातवास संपला. आपला अज्ञातवास यशस्वीपणे पार पडल्यावर त्यांनी शमी वृक्षाच्या ढोलीत लपवलेली आपली शस्त्रे पुन्हा धारण केली. या दोन्ही घटना फारच परिवर्तनकारक ठरल्या. कारण रावणवधानंतर लंकेतील युद्धाची सांगता झाली व राम वनवास संपवून अयोध्येस परत जायला निघाले आणि पांडवांचा अज्ञातवास संपल्यानंतर काही काळातच कुरुक्षेत्राचे महायुद्ध झाले, त्यामुळे पुन्हा शस्त्र ग्रहण ही अप्रत्यक्षपणे युद्धाची नांदीच ठरली.
                     यांचबरोबर अशा अनेक कथा आहेत, ज्या दसऱ्याच्या दिवसासोबत जोडल्या गेल्या आहेत. आज दुर्गादेवीने महिषासुराचा वध केला आणि सृष्टीला नवजीवन दिले. दक्षिण भारतात या देवीला चामुंडा किंवा चामुंडेश्वरी असे म्हणतात. महिषासुर वधानंतर घटस्थापनेला बसलेल्या देवींचे विसर्जन होऊन नवरात्रीची सांगता होते. तसेच याच दिवशी आपण सरस्वती पूजन देखील करतो. याचबरोबर असे म्हणतात कि आजच्याच दिवशी कुबेराने कौत्साच्या विनंतीवरून अयोध्येबाहेर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला.   त्या मुद्रा ज्या भागात पडल्या होत्या त्याच्या आजूबाजूस आपट्याची झाडे होती. म्हणून आजच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची प्रथा पडली आहे.
                      शिवाजी महाराजांच्या काळात या दिवशी त्यांचे मावळे शेतीची कामे आटपून पुन्हा सैन्यात सामील होत असत. कारण चार महिन्यांचा पावसाळा संपल्यावर दसऱ्याच्या दिवशी युद्ध मोहिमांना पुन्हा सुरुवात होत असे. त्यामुळे पूर्वीच्या काळी राजांच्या दृष्टीने हा दिवस त्याच्या सामर्थ्य प्रदर्शनासाठी महत्वाचा असायचा कारण याच दिवशी 'सीमोल्लंघन' केले जात असे. अशा निरनिराळ्या घटनांचे एकत्रितरित्या महत्व लाभल्यामुळे भारतभर हा दिवस महत्वाचा मानला जातो. मग तो  दिल्लीतील भव्य रावण दहन सोहळा असो अथवा म्हैसूरच्या चामुंडेश्वरीची राजेशाही थाटातील मिरवणूक, आजचा दिवस हा शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असल्यामुळे मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.
                  दसऱ्याच्या दिवसाचा आणखी एक पैलू म्हणजे महाराष्ट्रात दशमीच्या दिवशी तर दक्षिण भारतात नवमीच्या दिवशी केले जाणारे आयुध पूजन! सैनिकांची शस्त्रे, कामगारांची अवजारे, तंत्रज्ञांची यंत्रे  किंवा लेखकांची लेखणी, ही सर्वच आयुधे म्हणजे त्या त्या व्यक्तींचे सामर्थ्य आहे. आपल्यातील गुणांना आणि  विचारांना मूर्त स्वरुपात आणण्यासाठी ही आयुधेच फार मोलाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे अशा आयुधांच्या प्रति आदर आणि कृतज्ञता दर्शविण्यासाठी म्हणून ही पूजा करतात.
                   दसरा या शब्दाची व्युत्पत्ती पहिली तर ती आहे 'दश'- ‘हरा' ; म्हणजे दुष्ट प्रवृत्तींचा विनाश  आणि  अर्थातच चांगल्या गोष्टींचा वाईट प्रवृत्तींवर विजय, म्हणून या दिवसाला 'विजयादशमी' असेदेखील संबोधले जाते. आजच्या दिवशी सांगितली जाणारी राम-रावणाची गोष्ट म्हणजे विजयादशमीचा पाया आहे. खोलात विचार करून पहिले तर असे वाटते की राम आणि रावण ही दोन विचारधारांची प्रतीके आहेत. ह्या दोन व्यक्तीरेखा म्हणजे मानवी मनाच्याच दोन बाजू आहेत. राम म्हणजे चांगुलपणा आणि सद्विवेक बुद्धी तर रावण म्हणजे खल मनोवृत्ती आणि अहंकार! आपण कोणीच परिपूर्ण नसतो, त्यामुळे आपल्या मनात राम आणि रावण कायमच वास करत असतात, पण महत्वाचे हे आहे की आपण कोणती बाजू स्वीकारतो! राम रावणाच्या गोष्टीत ज्याप्रमाणे राम रावणाचा वध करतो त्याचप्रमाणे स्वतःमधील चांगल्या गुणांची कास धरून स्वतःच्याच दुर्गुणांवर मात करणे म्हणजेच खरी विजयादशमी! माणसाचा स्वतःच्या सद्विवेकबुद्धीवरचा विश्वास टिकून राहावा या कारणासाठी म्हणून दसरा हा सण महत्त्वाचा आहे.
                       आमच्या सर्व वाचकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या सर्वांच्याच आयुष्यात खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी होऊदेत हीच आमची सदिच्छा!

                                                                                                        सलील सावरकर- +६५  ८४३६०३४३
   अनुजा जोगदेव-  +९१ ८९७५७६७५९९

  

Monday, 25 September 2017

या देवी सर्वभूतेषु शक्तिरुपेण संस्थिता!


        

          अनादी अनंत काळापासून अस्तित्वात असलेली वैश्विक ऊर्जा म्हणजे 'शक्ती'...संपूर्ण विश्वाची जननी मानली जाणारी ही ऊर्जा 'आदिशक्ती' या नावाने संबोधली जाते. आदिशक्ती ह्या विश्वातील गतिमान चैतन्याचे प्रतिनिधित्व करते. आपल्या संस्कृतीतील सिद्धांतानुसार 'ब्रह्मा-विष्णु-महेश' हे जगाच्या मूलस्थानी आहेत आणि शक्ती ही या त्रिमूर्तींच्या केंद्रस्थानी आहे. तिच्यातील गुणांद्वारे ती त्रिमूर्तींसोबत जोडली गेली आहे. राजस गुणाद्वारे ती ब्रह्मासोबत, तामस गुणातून महेशासोबत तर सत्वाद्वारे विष्णूशी जोडली गेली आहे. त्यामुळे शक्ती म्हणजे ब्रह्मदेवाची नवनिर्माण ऊर्जा, विष्णूची बुद्धिमत्ता आणि महेशाची संहारक ऊर्जा यांचा संगम आहे. म्हणून शक्ती ही अशी स्वयंनिर्मित गोष्ट आहे जी कधीच कोणी निर्माण करू शकत नाही आणि नष्ट देखील करू शकत नाही.

           अशा या आदिशक्तीचेच एक रूप म्हणजे दुर्गा किंवा महिषासुरमर्दिनी! महिषासुर या दैत्याचा विनाश करण्यासाठी सर्व देवांनी दुर्गेला पाचारण केले. देवी व दैत्यामध्ये ९ दिवस आणि ९ रात्री युध्द चालले आणि दहाव्या दिवशी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि सृष्टीला अंतापासून वाचवले. देवीने दैत्याचा संहार केला या घटनेची आठवण म्हणून आपण नवरात्री किंवा दुर्गा पूजेचा उत्सव साजरा करतो आणि या आदिशक्तीची उपासना करतो. संपूर्ण भारतात तसेच नेपाळ व बांगलादेश येथे अनेक वर्षांपासून हा उत्सव साजरा केला जात आहे. या नऊ दिवसांमध्ये दुर्गेसोबतच महालक्ष्मी आणि सरस्वती या देवींचे पण पूजन केले जाते. ठिकठिकाणी अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी देवीची स्थापना केली जाते आणि विजयादशमीच्या दिवशी त्यांचे विसर्जन करतात.

           सिंह किंवा वाघावर आरूढ अष्टभुजा दुर्गादेवी म्हणजे विश्वजननीने अन्याय आणि वाईट प्रवृत्त्तीचा संहार करून जगाचे संरक्षण करण्यासाठी धारण केलेला उग्र अवतार आहे. तिच्या आठ हातांमध्ये देवांनी तिला प्रदान केलेली अस्त्रे आहेत. शंख, चक्र,धनुष्य-बाण, ढाल-तलवार, भाला आणि फास ही आयुधे तिने हातांमध्ये धारण केली आहेत. तिची आयुधे म्हणजे स्वयंशिस्त, निस्वार्थीपणा, भक्ती, ध्यान आणि चैतन्य यांची रूपके आहेत. आयुधे म्हणजे प्रत्येक योद्ध्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे बुद्धीचे उपासक दुर्गेच्या हातांमध्ये इतर शस्त्रांसोबत लेखणी देखील दाखवतात, कारण त्यांच्यासाठी लेखणी हेच शस्त्र आहे. म्हणूनच दुर्गेचे रूप हे परिवर्तनशील आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावरील उग्र व तीव्र भाव म्हणजे विनाशकारी प्रवृत्तीच्या विरोधासाठी उमटलेल्या रागाचे प्रतिबिंब आहे, पण याचबरोबर ती आपल्या भक्तांसाठी उदार आणि दयाळू आहे.

           व्युत्पत्तीशास्त्रानुसार 'दुर्गा' या शब्दाचा अर्थ आहे 'अगम्य' किंवा ‘अजिंक्य'! आपल्यासाठी दुर्गा म्हणजे केवळ पौराणिक देवता नसून एक संज्ञा आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या राष्ट्राला एकत्र जोडणारे गीत 'वंदे मातरम'! स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लिहिल्या गेलेल्या या गीतामागील प्रेरणासुद्धा दुर्गाच होती. तसेच आपण आपल्या जन्मभूमीला 'भारत माता' असे संबोधतो, ही धर्मनिरपेक्ष संज्ञा आहे. कारण आपली 'भारत माता' म्हणजे केवळ हिंदूच नाही तर भारतभूमीवरील सर्व लोकांचे संरक्षण करणाऱ्या 'जगत्तारिणी दुर्गा' या रुपावरच आधारित आहे. प्रखर दुर्गा असो किंवा शांत सरस्वती, संपन्न लक्ष्मी असो किंवा तेजस्वी भारत माता, या सर्व रूपांच्या मागची संकल्पना एकच ती म्हणजे -- 'संरक्षक सार्वभौम आदिशक्ती'!. अशा अद्वितीय संकल्पनेतूनच आपल्याला भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाची जाणीव होते.

           याचबरोबर देवी ही एका महत्वाच्या गोष्टीचे प्रतीक आहे, ते म्हणजे 'सृजनाचे'! सर्जनशीलता म्हणजे या विश्वातील प्रबळ गोष्ट आहे. शौर्य, बुद्धिमत्ता, कला, ऐश्वर्य आणि सौंदर्य यांचा मिलाफ असलेली तसेच वाईट प्रवृत्तीचा नाश करून विश्वाला नवजीवन देणारी देवी म्हणजे मूर्तिमंत सर्जनशीलता! म्हणूनच नवरात्री हा सृजनाचा-सर्जनशीलतेचा उत्सव व्हावा, असे आपल्या पूर्वजांना वाटले असेल. त्यामुळे प्रत्येकानी आपल्यातील सर्जनशीलतेचे चैतन्य जागृत ठेवणे म्हणजेच या आदिशक्तीचीची खऱ्या अर्थाने केलेली उपासना!



                                                                                                 सलील सावरकर- +६५ ८४३६०३४३

अनुजा जोगदेव- +९१ ८९७५७६७५९९